श्वसनसंस्थेचे आजार

ऍडेनोईड ग्रंथीवाढ

ऍडेनोईड (ऍडेनो) नावाच्या रसग्रंथी नाक आणि घसा यांना जोडणा-या भागात पाठभिंतीवर असतात. साध्या तपासणीत त्या दिसत नाहीत.

ऍडेनोग्रंथीचा त्रास तीन ते पाच वर्षे या वयात विशेष असतो. ऍडेनोवाढीची मुख्य खूण म्हणजे मूल श्वासासाठी तोंड उघडे ठेवते. मधूनमधून बारीक खोकलाही असतो. अशा मुलांना झोपेत श्वासोच्छ्वासाला विशेष त्रास होतो.

उपचार

ऍडेनोसुजेवर कॉट्रिमोक्षझोल च्या किंवा ऍमॉक्सी गोळयांचा उपयोग होऊ शकतो. सहसा पाच वर्षानंतर हा त्रास थांबतो. पण त्रास वारंवार होत असेल तर शस्त्रक्रियेने या ग्रंथी काढून टाकणे चांगले. टॉन्सिलच्या शस्त्रक्रियेत ऍडेनोईडग्रंथीही काढून टाकली जाते.

होमिओपथीने टॉन्सिलसूज व ऍडेनोईडसूज बरी होते असा अनेक जणांचा अनुभव आहे. म्हणून शस्त्रक्रियेआधी होमिओपथीचा उपयोग करून पहावा. यासाठी होमिओपथीचे प्रकरण पहा.

छातीत पाणी, पू होणे

न्यूमोनिया किंवा क्षयरोग यात फुप्फुसांचा जंतुदोष होतो. हा जंतुदोष फुप्फुसांच्या दुपदरी आवरणापर्यंत पोचला तर या आवरणासही जंतुदोष होतो. निरोगी अवस्थेत या दुपदरी आवरणात थोडा द्रव (10 मिलि) असतो. फुप्फुसाच्या हालचालीस असे वंगण म्हणून आवश्यक असते. जंतुदोषामुळे यात पाणी, पू होतो. यामुळे त्या भागातल्या फुप्फुसाची हालचाल कमी होते व श्वसनाला अडथळा येतो. क्ष किरण, सोनोग्राफी याचे चांगले निदान होऊ शकते. सिटीस्कॅन जास्त अचूक निदान करू शकते.

लक्षणे-तपासणी

छातीच्या संबंधित भागात दुखते व दम लागतो. जंतुदोषामुळे ताप आणि थकवा जाणवतो. या भागात बोटाने ठोकल्यावर ‘ठक्क’ असा (घट्ट) आवाज येतो. आवाजनळीने तपासल्यावर श्वसनाचे आवाज त्या भागात अजिबात ऐकू येत नाहीत.

उपचार

या रोगावर तज्ज्ञ डॉक्टरच उपचार करू शकतात. पाणी खूप असेल तर दम लागतो. अशा वेळी सुई टोचून पाणी काढून टाकणे आवश्यक आहे. काढलेल्या द्रवाचा  नमूना जैवरासायनिक आणि सूक्ष्मदर्शक तपासणीसाठी पाठवतात, यातून रोगनिदण होऊ शकते

पू असेल तर छातीतून पू काढून टाकण्यासाठी छोटी नळी बसवावी लागते. यासाठी छोटी शस्त्रक्रिया करावी लागते.

जंतुदोष आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती जंतुविरोधी औषधे देण्यात येतात. जोपर्यंत जंतुदोष आटोक्यात येत नाही तोपर्यंत पाणी, पू जमतच राहील. बहुधा अशा आजाराचे क्षयरोग हेच कारण असते.

सायनसदुखी

नाकाच्या पोकळीच्या वर, बाजूला, मागे आणि मेंदूखाली अशा प्रत्येकी चार-चार पोकळया असतात. त्या नाकाला जोडलेल्या असतात. या पोकळयांनाच सायनस म्हणतात. या पोकळया हाडांमध्ये असतात. निरोगी अवस्थेत या पोकळया हवेशीर व रिकाम्या असतात. सर्दीपडशात या पोकळयांची नाकात उघडणारी तोंडे सुजून बंद होतात. त्यामुळे पोकळयांतल्या आवरणालाही सूज येते. यामुळे डोके ‘जड’ वाटते. सर्दीपडसे कमी झाले, की या पोकळयाही मोकळया होऊन बरे वाटते.

रोगनिदान

सर्दीपडशात काही वेळा या पोकळयांमध्ये जंतुडओष शिरून दाह सुरू होतो. बहुधा हा दाह जिवाणूंमुळे होतो. जेथे दाह होतो ती पोकळी जड होते व नंतर पू भरून ठणकते. जी पोकळी ठणकते त्यावर दाबल्यावर दुखरेपणा आढळतो. डोळयाखालच्या किंवा कपाळावरच्या सायनस पोकळयांचे दुखणे अशाने सहज समजते. मात्र नाकामागील अंतर्भागात पोकळी सुजली असेल तर वरून कळत नाही. अशा वेळी फक्त डोके ठणकत राहते. ही डोकेदुखी बहुधा कानापुढच्या खोलगट भागात असते.

उपचार
  • सायनसदुखीत पेनिसिलीन किंवा अमोक्सीसिलिन किंवा कॉट्रिमोक्षझोल  गोळया देऊन जंतुदोष आटोक्यात आणता येतो.
  • डोकेदुखीसाठी ऍस्पिरिन किंवा पॅरासिटामोल  गोळया द्याव्यात.
  • दाह आटोक्यात आला तर चार-पाच दिवसांत जडपणा कमी होऊन सायनसदुखी बरी होते.
  • औषधे देऊनही सायनससूज बरी न झाल्यास कानाच्या तज्ज्ञाकडे पाठवावे. सायनस मध्ये नाली घालून धुवून काढतात (जल नेतीचा असाच उपयोग होतो)
होमिओपथी निवड

हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, सिलिशिया

घोळणा फुटणे

उन्हातून आल्यावर काही लहान मुलांमध्ये नाकातून रक्तस्राव होतो. याला घोळणा फुटणे असे म्हणतात. यात नाकाच्या पुढच्या भागातल्या नाजूक रक्तवाहिन्या (केशवाहिन्यांचे जाळे) उष्णतेने फुगून फुटतात व रक्त येते.

काही वेळा अतिरक्तदाब किंवा रक्ताच्या कर्करोगात पण घोळणा फुटतो. म्हणून वारंवार असा त्रास होत असल्यास तज्ज्ञास दाखवावे.

प्रथमोपचार

रक्तस्त्राव सुरु असताना जास्त हालचाल न करता बसून रहावे. डोके पुढे झुकलेले ठेवावे. म्हणजे रक्त गिळले जाणार नाही.

  • ऍड्रेनॅलिन स्प्रे उपलब्ध असल्यास नाकात एकदा फवारा मारावा. याने रक्तवाहिन्या आकसून रक्तस्राव थांबतो. वाटल्यास 5 मिनिटांनी परत एकदा मारावा. मात्र अतिरक्तदाबाच्या रुग्णांना हा उपचार करु नये.
  • नाकाचा पुढचा भाग हाताच्या बोटाने 2-5 मिनिटे दाबून धरावा. याने  रक्त येणे बंद होते.
  • नाकाला व गालांना थंडगार पाणी किंवा बर्फ लावल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तस्राव थांबायला मदत होते.
  • रक्तस्राव थांबल्यावर मानेखाली उशी घेऊन उताणे निजून राहावे.
आयुर्वेद

वारंवार घोळणा फुटण्यामागे योग्य ती सर्व तपासणी (तज्ज्ञाकडून) होऊन गंभीर कारण नसल्यास पुढील उपचार करा. पोटातून दीड-दोन चमचे अडुळसा रस व मध आणि गूळ (किंवा साखर) द्यावे. रक्तस्रावाच्या प्रवृत्तीला या उपायाने आळा बसतो.