डोळे

जीवनसत्त्व ‘अ’ आणि आपले डोळे

डोळयाच्या आरोग्यासाठी ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये या जीवनसत्त्वाच्या अभावाचा परिणाम तीव्र असतो. हिरव्या पालेभाज्या, पिवळी व लाल फळे (आंबे, पपई, गाजर), शेवगा, मांसाहारातील यकृत, इत्यादींमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ भरपूर प्रमाणावर असते. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावाने आधी रातांधळेपणा येतो. यामुळे रात्री जेवताना हात ताटात चाचपडत राहतो. यापुढे श्वेतपटलावर पांढरे ठिपके (बिटॉट स्पॉट), बुबुळ व नेत्रअस्तराचा कोरडेपणा, बुबुळाचा धुरकटपणा, बुबुळावर जखमा व मग फूल पडणे, नेत्रपटलाची हानी होणे, इत्यादी बदल होतात. रातांधळेपणाच्या अवस्थेतच ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस दिला पाहिजे (दोन लाख युनिट).आरोग्य केंद्रातर्फे मुलांना असा प्रतिबंधक डोस दर सहा महिन्यांनी दिला जातो. यामुळे हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे. आपली रोगप्रतिकारशक्तीही ‘अ’ जीवनसत्वामुळे टिकून राहते.

पापण्यांना उवा लागणे

हा त्रास बहुधा लहान मुलांना होतो. या उवा सहसा जांघेतल्या केसांवर राहणा-या जातीच्या असतात. याचा संसर्ग मुलांना एकमेकांत होतो. नीट पाहिल्याशिवाय या उवा दिसून येत नाहीत. मुख्य लक्षण म्हणजे पापण्यांना खाज सुटून मुले डोळे चोळत राहतात. उपचार म्हणजे उवा चिमटयाने किंवा नखाने काळजीपूर्वक काढून टाकणे.

रांजणवाडी

पापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठ, किंवा पू येऊन पापणी सुजण्याला आपण रांजणवाडी म्हणतो. पिकल्यावर रांजणवाडी आपोआप फुटते. पू गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. पण पापणी दाबून पू काढू नये. कारण त्यामुळे कधीकधी पू उलट रक्तामधून मेंदूत जाण्याची शक्यता असते.

रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास पुढील साधा उपाय करावा. कपडयाचा बोळा गरम पाण्यात भिजवून दिवसातून 5-6 वेळा शेकवावे. याने एक-दोन दिवसांत रांजणवाडी जागच्या जागी जिरण्याची शक्यता असते. अशी न जिरल्यास ती शेकाने फुगून फुटते. ती लवकर मोकळी व्हावी यासाठी असा शेक उपयोगी पडतो. दुसरा एक उपाय म्हणजे सुजेच्या सुरुवातीस लसणाच्या पाकळीचा रस रांजणवाडीवर सकाळ-संध्याकाळ लावावा. याने रांजणवाडी न सुजता जिरून जाते.

रांजणवाडी मोठी होऊन पू भरला असल्यास तो काढणे आवश्यक असते. पापणीचा तेवढाच केस नखात अथवा चिमटयाने धरून उपसून काढल्यास कणभर पू बाहेर पडतो. दोन-तीन दिवसांत जखम भरून येते. याने उपयोग न झाल्यास किंवा सतत रांजणवाडी येत असल्यास कोझालच्या गोळया घ्याव्यात. यानेही आराम न पडल्यास नेत्र तज्ज्ञाकडे पाठवावे.

लासरू – डोळयाला पाझर

डोळयांच्या नाकाकडच्या कोप-यांत दोन्ही पापण्यांच्या टोकांशी एकेक छिद्र असते. त्यातून हे अश्रू एका नलिकेमार्फत नाकात उतरतात. यामुळेच रडताना डोळयांबरोबरच नाकातूनही जास्त पाणी येते.

काही आजारांत (उदा. खुप-या, डोळे येणे) जंतुदोषामुळे हे छिद्र व नलिका बंद होते. यामुळे पाणी नाकात उतरण्याचा मार्ग बंद होऊन डोळयांत सारखे पाणी साठून राहते. यामुळे डोळे जास्त ओले दिसतात.

या विकारासाठी तज्ज्ञांकडे पाठवावे. अश्रुनलिका उघडण्यासाठी या छिद्रातून एका बारीक पिचकारीतून स्वच्छ सलाईन दाबाने सोडतात. यामुळे अश्रूंचा रस्ता पूर्वीप्रमाणे मोकळा होतो. तात्कालिक जंतुदोषासाठी कोझाल व दाह कमी करण्यासाठी ऍस्पिरिन द्यावे.

लक्षणे

पापण्यांच्या आतला भाग व डोळयाचा पांढरा भाग (श्वेतमंडल किंवा शुभ्रमंडल) यांवर एक नाजूक आवरण असते. या आवरणावर ब-याच सूक्ष्म रक्तवाहिन्या दिसून येतात. मात्र हे आवरण बुबुळाशी संपते. बुबुळावर रक्तवाहिन्या अजिबात नसतात. या आवरणाला मराठीत नाव नाही. या पुस्तकात आपण याला नेत्रअस्तर म्हणू या. ‘डोळे येतात’ तेव्हा खरे तर हे नेत्रअस्तर सुजते. यामुळे त्यावरच्या रक्तवाहिन्या विस्फारून रंग अधिक लालसर दिसतो. पूर्वी दाह या प्रक्रियेबद्दल आपण वाचले आहे. गरमपणा, वेदना, लाली, सूज, इत्यादी दाहाची सर्व लक्षणे या आजारात दिसून येतात. कधीकधी हे नेत्रअस्तर बुबुळावर चढून वाढते, यालाच वेल वाढणे असे नाव आहे.

  • अश्रुपिशवीत जास्त प्रमाणात अश्रु साठून राहणे व पापण्या ओल्या होणे.
  • नवजात अर्भकांमध्ये अश्रुवहननलिका बिघाडामुळे अश्रू हे अश्रुपिशवीतच साठून राहतात किंवा गालांवरून खाली ओघळतात.
  • अश्रू साठवले गेल्यामुळे अश्रुपिशवीत जिवाणू संसर्ग होऊन चिकट पू तयार होतो व तोच अश्रुवहनात अडथळा ठरतो.
  • मुलांमध्ये अश्रुपिशवीच्या ठिकाणी सूज येते व डोळे लाल होतात त्यामुळे अश्रुपिशवीस संसर्ग होतो.
उपचार
  • अश्रुपिशवी/कोश  दिवसातून 4 ते 6 वेळा हलके चोळणे. यामुळे पू निघून जाण्यास मदत होते. हा उपचार 1 वर्षापेक्षा लहान मुलांमध्ये उपयोगी आहे.
  • जर डोळे लाल झाले असतील व पू येत असेल तर औषधी थेंब घालावे.
  • अश्रुवहननलिकेत  ‘सिलिकॉन नलिका’ एक आठवडयासाठी घालून ठेऊन हा अडथळा दूर करता येतो.
शस्त्रक्रिया
  • औषधोपचाराचा उपयोग न झाल्यास पूर्ण भूल देऊन शस्त्रक्रिया करावी लागते.
  • वेळीच औषधोपचार व नलिकेवर दाब देऊन केलेला उपचार शस्त्रक्रिया टाळू शकतो.
उपचार न केल्यास उद्भवणारा धोका

अश्रुपिशवीच्या ठिकाणी एक टणक गाठ निर्माण होऊ शकते व ती फुटून त्यातून पस बाहेर येऊ शकतो.