आधुनिक औषधविज्ञान

औषधांच्या किमती

भारतातील बहुतेक औषधांच्या फार्म्युल्यांचे उत्पादन हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती आहे. त्यामुळे आवश्यक औषधांची मनमानी किंमत ठरवून अव्वाच्या सव्वा फायदा उकळणे हे कंपन्यांना सोपे आहे. अशा औषधांवर शंभर-दोनशे टक्के नफा सर्रास घेतला जातो. योग्य नफा घेऊन स्वस्त किमतीतही औषधे उपलब्ध करता येतात, हे काही भारतीय कंपन्यानी दाखवून दिले आहे.  खाली ब्रँडेड औषधे आणि जेनेरिक औषधे यांची किंमत तुलना दर्शवणारी १० उदाहरणे दिली आहेत. किंमती साधारण अंदाजे (per strip / pack) असून जनऔषधी किंवा generic औषधे सहसा खूप स्वस्त असतात.

ब्रँडेड व जेनेरिक औषधांच्या किंमतींची तुलना
क्र.औषध (Generic नाव)ब्रँड नाव (उदाहरण)ब्रँड किंमत (₹)जेनेरिक किंमत (₹)
1पॅरासिटामॉल 500 mgCrocin / Calpol30–355–10
2अमॉक्सिसिलिन 500 mgMox / Novamox120–15035–50
3अ‍ॅझिथ्रोमायसिन 500 mgAzee / Azithral90–12025–40
4मेटफॉर्मिन 500 mgGlycomet35–5010–15
5अम्लोडिपीन 5 mgAmlong / Stamlo40–6010–15
6ओमेप्राझोल 20 mgOmez80–12015–25
7सेटिरीझिन 10 mgOkacet35–405–10
8अल्बेंडाझोल 400 mgZentel25–358–12
9आयर्न + फॉलिक अ‍ॅसिडDexorange120–15025–40
10कॅल्शियम + व्हिटॅमिन DShelcal90–12030–40
महत्वाचे मुद्दे
  • जेनेरिक औषधांमध्ये ब्रँडेड औषधांप्रमाणेच सक्रिय घटक (Active ingredient) असतो.
  • औषधाचा गुणवत्ता आणि परिणाम जवळजवळ समान असतो.
  • किंमत मात्र ५०% ते ९०% कमी असू शकते.

औषधवापराने निर्माण झालेले प्रश्न 

औषधांच्या व्यवहारामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते असे :

  • वैद्यकीय स्वरूपाचे प्रश्न : उदा. स्त्रीसंप्रेरकांच्या वाढत्या वापराने स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम, औषधांनी गर्भावर दुष्परिणाम, जंतुविरोधी औषधांच्या गैरवापराने जंतूंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणे, इत्यादी.
  • अवाजवी किंमतींमुळे जनतेस पुरेशा व योग्य औषधोपचारांपासून वंचित राहावे लागणे आणि आर्थिक नुकसान.
  • औषधउद्योगांवर ग्राहकांचा व सरकारचा वचक नसल्याने निरर्थक औषधांचा पूर, तर आवश्यक औषधांचा तुटवडा कायम राहणे.
आपण काय करू शकतो?

या प्रश्नांवर सरकार, वैद्यकीय व्यवसाय करणारा वर्ग व जनता या सर्वांनीच अंकुश आणायला पाहिजे. अनेक संस्था त्यासाठी काम करीत आहेत. आपणही काही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, ती अशी :

  • रोगनिदान करूनच औषधोपचार करण्यासाठी आग्रह करणे.
  • अपुरा औषधोपचार न करणे. आजाराचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सुरक्षितपणे औषधांचा वापर करणे.
  • रुग्णांनी औषधांची पुरेशी माहिती घेणे. यासाठी आरोग्यशिक्षण महत्त्वाचे आहे.
  • शक्यतोवर स्थानिक परंपरागत उपचारांचा वापर करणे. हा भाग फार महत्त्वाचा आहे. कित्येक आजारांत हे स्थानिक उपचार आधुनिक उपचारांपेक्षा सरस ठरतात. केवळ स्वस्त आहे म्हणून ही व्यवस्था दुय्यम ठरत नाही.
  • टॉनिके, इंजेक्शने, सलाईन, इत्यादींच्या वाढत्या वेडाला आळा घालण्यासाठी लोकशिक्षण करणे.

इंजेक्शन – सलाईन – टॉनिकांचे खरे काय, खोटे काय!

आधुनिक विज्ञानामुळे बहुतेक सर्व औषधे तोंडाने घेऊनही परिणामकारक झाली आहेत. जी औषधे पोटात घेऊन चालत नाहीत अशा औषधांची संख्या फार कमी आहे. तसेच औषध पोटात घेण्याचा मार्ग जास्त निर्धोक, स्वस्त, सोपा आहे.

मात्र इंजेक्शनचा आग्रह सामान्य डॉक्टर व पेशंट दोघेही धरतात. इंजेक्शनमुळे जास्त फी सांगता येते हे डॉक्टरांचे धोरण असते. तर इंजेक्शन म्हणजे रामबाण उपाय असा लोकांचा गैरसमज आहे. रोगराईच्या बाजारपेठेत त्यामुळे इंजेक्शनची चलती आहे.

औषध पोटात घेतले तर अर्ध्या तासाने रक्तात पसरते आणि इंजेक्शनने घेतले तर पाच मिनिटांत पोहोचते. एवढया फरकासाठी 20-50 रुपयांची जादा किंमत मोजावी लागते. बरेच आजार (उदा. सर्दी) औषधाशिवाय बरे होऊ शकतात. ज्या रुग्णांना औषधोपचार लागतो त्यांतल्या पाच-दहा टक्के लोकांना देखील इंजेक्शनची बिलकुल गरज नसते. व्यवहारात मात्र डॉक्टरकडे जाणे म्हणजे टोचून घेणे असेच समीकरण झालेले आहे. दिवसेंदिवस हे वेड वाढतच चाललेले आहे.

इंजेक्शनप्रमाणेच हल्ली ‘सलाईन’ वेड वाढत चालले आहे. सलाईन म्हणजे मीठपाणी किंवा साखरपाणी अशी मिश्रणे असतात. ही निर्जंतुक असतात आणि शिरेतून देता येतात. सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध आहे. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. पण सलाईनचा गैरवापरही प्रचंड प्रमाणात होतो. ग्लुकोजमुळे तरतरी वाटते. सलाईन घेतल्याचे रुग्णाला मिळणारे मानसिक समाधान सोडल्यास एकदम नव्वद-शंभर रुपये मिळवणे हाच ब-याच व्यावसायिकांचा हेतू असतो. म्हणून इंजेक्शन व सलाईनची नेमकी गरज काय याची माहिती थोडक्यात इथे दिली आहे.

इंजेक्शन कशासाठी लागते?
  • अशी काही औषधे आहेत जी तोंडाने घेता येतच नाहीत किंवा काही औषधे तोंडाने घेऊन परिणामकारक नसतात. उदा. जेंटामायसिन इंजेक्शन, सर्प उतारा, पेनिसिलीन, इ. (अशी औषधे फार कमी आहेत.)
  • रुग्ण तोंडाने औषध घेण्यास असमर्थ असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. उदा. खूप उलटया होत आहेत किंवा तोंडाने काही घेण्यास बंदी (उदा. शस्त्रक्रियेनंतर) असल्यास.
  • काही आजारांमध्ये काही औषधे इंजेक्शनमार्फतच चांगला गुण देतात. उदा. न्यूमोनियामध्ये पेनिसिलीन इंजेक्शन, गरमी (लिंगसांसर्गिक आजार) मध्ये पेनिसिलीन इंजेक्शन, इ.
  • अत्यवस्था : उदा. बेशुध्दी, हृदयविकाराचा झटका, इत्यादी. या परिस्थितीत इंजेक्शनची ताबडतोब होणारी क्रिया आवश्यक असते.

हे सर्व लक्षात घेता अनेक दवाखान्यांमध्ये दिली जाणारी बहुतेक इंजेक्शने (‘ब’ जीवनसत्त्व, जेंटामायसिन, इ.) बहुधा अनावश्यक असतात.

इंजेक्शनांचे दुष्परिणाम

इंजेक्शनांचे दुष्परिणामही असतात.

इंजेक्शनच्या जागी जंतुदोष, गळू होण्याची शक्यता असते. इंजेक्शनमुळे नसेला इजा होऊन हात निर्जीव होऊ शकतो. (उदा. दंडात दिली गेलेली इंजेक्शने).

सुई, सिरिंज पुरेशी निर्जंतुक नसेल तर ब कावीळ व ‘एड्स’ ची लागण इंजेक्शनमार्फत होऊ शकते. म्हणून इंजेक्शनचा वापर काटेकोरपणेच केला पाहिजे. दुर्दैवाने इंजेक्शन हे पैसे काढण्याचे आणि खोटे समाधान करण्याचे साधन होऊन बसले आहे.

सलाईन

सलाईन हे जीवदायी औषध आहे, पण त्याचा अनावश्यक वापर फार होतो. सलाईन खालील बाबतीत आवश्यक असते.

  • तीव्र शोष, त्यामुळे बेशुध्दी व मूत्रपिंडाचे काम बंद पडणे.
  • तोंडाने अन्नपाणी देणे वर्ज्य असेल तर उदा. शस्त्रक्रियेनंतर, तसेच रुग्ण बेशुध्द असेल तर.
  • सलाईनवाटे काही औषधे द्यायची असतील तर उदा. तीव्र दमा असताना सलाईनवाटे इंजेक्शन देणे. किंवा बाळंतपणाच्या कळा येण्यासाठी सलाईनमधून ऑक्सिटोसिन देणे.
  • दिवसातून 4-5 वेळा शिरेतून इंजेक्शन द्यायचे असेल तेव्हा वारंवार टोचावे लागू नये म्हणून सलाईन देत राहणे.
  • विशिष्ट आजारात रुग्ण कधीही अत्यवस्थ होण्याची शक्यता असते. अशा वेळी ‘शीर’ (नीला) ताब्यात ठेवण्यासाठी सलाईन हळूहळू देणे (उदा. बाळंतपणात झटके येतात तेव्हा)

पण व्यवहारात किती तरी वेळा उगाचच सलाईन दिले जाते. रुग्णदेखील अज्ञानाने सलाईनचा आग्रह धरतात. अशुध्द सलाईनमुळे रुग्ण दगावण्याची उदाहरणे आहेत. अनावश्यक इंजेक्शने व सलाईन टाळणे हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कावीळ, एड्स यांसारखे सांसर्गिक आजार इंजेक्शन व सलाईनच्या सुईने पसरू शकतात. हे लक्षात ठेवले पाहिजे. मुख्य म्हणजे सलाईनच्या गैरवापराने वैद्यकीय खर्च अनेकपटीने वाढतो.

टॉनिके

बहुतेक टॉनिकांत साखरपाणी, जीवनसत्त्वे मद्यार्क व लोहक्षार असतात. मद्यार्कामुळे थोडी तरतरी वाटते व टॉनिकवर श्रध्दा बसते. परंतु ज्या प्रमाणात टॉनिके विकली जातात त्याच्या एक-दोन टक्के प्रमाणात देखील त्यांचा उपयोग नसतो. टॉनिकमधील काही जीवनसत्त्वे लघवीवाटे फेकून दिली जातात. त्यामुळे सरसकट टॉनिक लिहून देणे किंवा विकत घेणे हा अडाणीपणा आहे. टॉनिक म्हणजे लूटमारीचे एक साधन झाले आहे.