अनेक श्वसन सांसर्गिक आजार एकमेकांमध्ये पसरतात. यात अनेक विषाणू जिवाणू कारणीभूत असू शकतात. साथी निर्माण करणाऱ्या अशा आजारांना साथीचा न्यूमोनिया असे नाव आहे. पूर्वी प्लेग नावाचा रोग व्हायचा तो याच गटात आहे. आता यात मुख्यत: विषाणू, जीवाणू आणि अन्य काही सूक्ष्मजंतू असू शकतात. हे आजार श्वसनमार्गे पसरतात त्यामुळे नियंत्रणासाठी हा प्रसार रोखू शकणारे उपाय करावे लागतात. उदाहरणार्थ कोविद साथीत आपण हे पाहिले की मास्क वापरून आपण याचे नियंत्रण करीत होतो. खोकताना शिंकताना रुमाल/मास्क वापरणे, वारंवार हात धुणे (कारण हातावरचे जंतु देखील नाकावाटे प्रवेश करू शकतात), वातानुकूलन कमी करून उघडी खेळती हवा ठेवणे इत्यादी उपाय याचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक होतात.
साथीच्या काळात याचे निदान करणे जास्त सोपे होते. ताप खोकला छाती दुखणे थकवा डोकेदुखी अशी लक्षणे असतात. तपासणीत छातीत न्यूमोनियाग्रस्त जागेवर दुखरेपणा आढळतो, क्ष किरण चित्र पाहिल्यास फुफ्फूसाचा तो भाग पांढुरका दिसतो. रक्त तपासणीत पेशींच्या प्रकार-प्रमाणात बदल दिसून येतो.
उपचार करताना नातेवाईक रुग्णालय कर्मचारी यांना विशेष काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ मास्क वापरणे, हातमोजे वापरणे, वारंवार हात धुणे आदि. आजाराप्रमाणे जिवाणूविरोधी औषधे घ्यावी लागतात. विषाणूसाठी औषध नाहीत, मात्र जीवाणू-न्यूमोनियायला औषधे उपलब्ध आहेत . साथीप्रमणे हे धोरण ठरते. आवश्यक वाटल्यास रुग्णालयात भरती करावी लागते. या प्रकरणात पुढील भागात स्वाईन फ्लू बद्दल वर्णन दिले आहे. याचप्रमाणे इतर समूह-न्यूमोनिया असतात. अर्थात फ्लू सारखी आजाराची सुरुवात झाली तरी फक्त काही जणांना न्यूमोनिया होतो, सगळ्यांना नाही. कोविड साथीत मध्ये हे आपण पाहिले की कोविड आजार अनेकांना झाला होता पण त्यात न्यूमोनिया सगळ्यांना झाला नव्हता.
स्वाईन फ्लू, नावाप्रमाणंच, हा डुकरांना होणा-या फ्लूमधून उत्पन्न झालेला एक विषाणू आहे. एखाद्या माणसाला एकतर स्वाईन फ्लूच्या रुग्णाकडून किंवा एखाद्या डुकराकडून संक्रमण होऊ शकतं. हा इन्फ्लुएन्झा विषाणू मानवी शरीराच्या बाहेर फार थोडा वेळ जगतो आणि ह्याच कारणानं तो उन्हाळ्याच्या उष्णतेत जगू शकत नाही पण पाऊस आणि हिवाळ्यात दीर्घकाळ जगतो. म्हणून, त्याचा प्रसार मॉन्सून आणि हिवाळ्यात अधिक होतो. ऐकायला विचित्र वाटेल, पण अन्य कोणत्याही फ्लूपेक्षा स्वाईन फ्लूमुळं मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत नाहीत. पण, म्हणून आपण खबरदारी घ्यायची नाही असं मात्र नाही. हा विषाणू बरेचदा आपलं रुप बदलतो, आणि म्हणून तो एखादी लस लवकरच किंवा काही काळानं निरुपयोगी ठरवतो. हा विषाणू रुग्णाच्या खोकल्यातून, शिंका, हातरुमाल, बिछान्यावरील चादरी, इ. मधून पसरतो. अशी अनेक संक्रमणं आपल्या नकळत पसरतात. दुर्मिळ प्रसंगी न्यूमोनियामुळं श्वसनक्रिया निकामी झाल्यानं तो घातक ठरु शकतो. स्वाईन फ्लूची नेहमीची लक्षणं ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घसा बसणं आणि वाहणारं नाक ही आहेत. परंतु औषधं घेण्यात घाई करु नका. प्रत्येक फ्लूसमान आजारात टॅमीफ्लूसारखं विषाणूविरोधी औषध घेणं आवश्यक नाही. या औषधाचे स्वतःचे दुष्प्रभाव आहेत. पण, आपण सुनिश्चित रुग्णांच्या संपर्कात असाल, किंवा काही विशिष्ट जोखीम असेल तर, आपण शक्य तितक्या लवकर विषाणूविरोधी औषध घ्यावं पण यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्वाईन फ्लूची लक्षणं नेहमीच्या फ्लूसमान असू शकतात, म्हणून त्याची खात्री करणं आवश्यक आहे. तसं करण्यासाठी, नाक आणि घशातील नमुन्याची प्रयोगशाळा तपासणी पुरेशी आहे.
स्वाईन प्लूच्या रुग्णाने विशेष काळजी घेतली पाहिजे. बहुतांश रुग्णांमध्ये बरं होण्यासाठी घरी आराम करणं, द्रवपदार्थ पिणं आणि पॅरासिटेमॉल गोळ्या घेणं या पद्धती बहुधा पुरेशा ठरतात. डॉक्टर-दवाखान्यांसाठी धावपळ करण्याची गरज नाही. इंजेक्शनं किंवा सलाईनची देखील गरज नाही.
पण आपल्याला श्वास घेण्यात अडचण होत असेल, किंवा तीन दिवसांहून अधिक काळ टिकलेला ताप असेल तर आपण डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.
पालकांनो, आपल्या मुलाला फ्लूसमान लक्षणं दिसत असतील, त्या मुलाचा श्वास जलद होत असेल किंवा घेण्यात अडथळा होत असेल, सतत ताप किंवा मूर्च्छा येत असेल तर आपण डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.
स्वाईन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी आपण ठराविक गोष्टींचं पालन करणं अत्यावश्यक आहे.
आपल्याला स्वाईन फ्लू झाला असेल तर, आपण खालील सूचनांचं पालन हमखास केलं पाहिजे.
स्वाईन फ्लूवर आता इंजेक्शन आणि नाकात स्प्रेच्या स्वरुपात लसी उपलब्ध आहेत. पण, तज्ञांच्या मते लस ही प्रत्येकासाठी नाही हे लक्षात ठेवा. आपल्याला स्वाईन फ्लू होण्याची जोखीम असेल तरच या लशीची शिफारस केली जाते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याविना लसी घेऊ नका.
हा आजार विषाणूंमुळे होतो. बर्ड फ्लू चे नाव आपण ऐकले आहेच. हा पक्ष्यांना होतो. क्वचित माणसाला होतो.
रोगाचे कारण – या विषाणूचे ए बी सी असे उपप्रकार आहेत यापैकी ए जातीचे विषाणू माणसासाठी जास्त घातक असतात. साधारणपणे फ्लू हा आजार माणसा माणसांत फिरत राहतो. या आजाराचा प्रसार एकमेकांमध्ये श्वासावाटे आणि स्पर्शित वस्तूंद्वारे होतो. यामुळे श्वसनसंस्थेचा आतून दाह सुरु होतो. एकूण आजार 3-5 दिवस टिकतो.
या आजारात मध्यम किंवा जास्त ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी आणि थकवा येतो. डोळयांना जळजळ होते. ताप सतत असतो. आजार आपोआप बरा झाला नाही तर काही गंभीर धोके संभवतात. यात न्यूमोनिया मेंदूसूज वगैरे घातक परिणाम होऊ शकतात.
सर्वसाधारण फ्लू साठी पॅरासिटामोल ची गोळी पुरते. खोकला कमी करण्यासाठी कोडीन हे औषध वापरावे. मात्र साथ आलीतर ऍमँटाडीन हे औषध वापरले जाते. साथीच्या काळात उपलब्ध असली तर लस देखील उपयुक्त आहे.
फ्लू हा आजार तुरळक प्रमाणात होतच असतो. मात्र पूर्वी याच्या जागतिक साथी येऊन गेलेल्या आहेत. या साथींमध्ये लाखो लोक दगावले हा इतिहास आहे. आपण बर्ड फ्लू चे नाव ऐकलेच आहे. हा फ्लू पक्षांना तर मारतोच पण तो माणसांमध्ये शिरला तर घातक ठरु शकतो. म्हणूनच बर्ड फ्लू च्या साथींमध्ये मोठया प्रमाणावर माणसांना वाचवण्यासाठी कोंबडया नष्ट कराव्या लागतात.